राष्ट्रीय

चंदगड विधानसभा मतदारसंघातील ५५ गावांचा हेरे सरंजाम प्रश्न अखेर कायमस्वरूपी निकाली!*

कृषी दिनाच्या दिवशी चंदगड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय; २२ हजार कुटुंबांना मिळणार शेतीचा मालकीचा हक्क*

*चंदगड विधानसभा मतदारसंघातील ५५ गावांचा हेरे सरंजाम प्रश्न अखेर कायमस्वरूपी निकाली!*

*कृषी दिनाच्या दिवशी चंदगड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय; २२ हजार कुटुंबांना मिळणार शेतीचा मालकीचा हक्क*

चंदगड, प्रतिनिधी :
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रलंबित असलेला चंदगड विधानसभा मतदारसंघातील ५५ गावांचा हेरे सरंजाम प्रश्न अखेर कायमस्वरूपी मार्गी लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी मध्यरात्री विशेष तत्परता दाखवत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयासाठी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

हेरे सरंजाम इनामातील जमीन प्रश्नामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शेतकरी मालकी हक्कापासून वंचित होते. जमीन कसत असूनही त्यांच्या नावावर मालकी नोंद होत नसल्याने अनेक प्रशासकीय, आर्थिक आणि कायदेशीर अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार शिवाजीराव पाटील यांनी विधानसभेत, मंत्रालयात आणि विविध स्तरांवर हा प्रश्न सातत्याने मांडत शासनाकडे पाठपुरावा केला होता.

शासनाच्या नव्या निर्णयानुसार सुमारे २२ हजार कुटुंबांना शेतीच्या मालकीचा अधिकार मिळणार असून १२ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक जमीन प्रत्यक्ष कुळांच्या नावावर होणार आहे. यामुळे अनेक पिढ्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळणार आहे.

विशेष म्हणजे, जमीन हस्तांतरण प्रक्रियेमधील अनेक जाचक कागदपत्रांच्या अटी शासनाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध दाखले, पुरावे आणि प्रशासकीय प्रक्रियांचा सामना करावा लागणार नाही. याशिवाय जमीन मालकीसाठी भरावी लागणारी नजराणा रक्कम पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्याही शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

*३५ वर्षांचा संघर्ष अखेर संपला*

हेरे सरंजाम प्रश्नामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना कर्ज, पीकविमा, अनुदाने तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येत होत्या. जमीन मालकी नसल्यामुळे वारसा नोंदी, खरेदी-विक्री, बँक कर्ज आणि इतर व्यवहारही अडचणीत येत होते. आता शासनाच्या निर्णयामुळे या सर्व अडचणी दूर होऊन शेतकऱ्यांना कायदेशीर मालकी हक्क प्राप्त होणार आहे.

*आमदार शिवाजीराव पाटील यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा*

हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांनी आमदार होण्यापूर्वीपासूनच आंदोलनात्मक भूमिका घेतली होती. आमदार झाल्यानंतर त्यांनी हा विषय विधानसभेत वारंवार उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अनेक वेळा बैठका घेऊन त्यांनी हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली होती.

या निर्णयामुळे चंदगड तालुक्यासह संपूर्ण परिसरातील शेतकरी कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, हा निर्णय ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

*निर्णयाचे प्रमुख मुद्दे:*

✔ ५५ गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली
✔ २२ हजार कुटुंबांना मिळणार शेतीच्या मालकीचा हक्क
✔ १२ हजार ५०० हेक्टर जमीन कुळांच्या नावावर
✔ कागदपत्रांच्या जाचक अटी रद्द
✔ नजराणा रक्कम पूर्णपणे माफ
✔ ३० वर्षांहून अधिक काळाचा संघर्ष संपुष्टात
✔ आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.

*—————-चौकट—————*

*मतदारसंघातील एखादे अवघड काम कसं करावं हे आमदार शिवाजी पाटीलांकडून शिकावं: ना.चंद्रशेखर बावनकुळे*

५५ गावांचा हेरे सरंजाम प्रश्न सोडविण्यासाठी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी गेल्या ४ वर्षात खुप प्रामाणिकपणे आणि तळमळीने धडपड केली आहे. प्रत्येक आठवड्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह माझ्याकडे येऊन या प्रश्नाचा पाठपुरावा केला आहे. खरं तर आज त्यांच्यामुळेच चंदगड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे असे गौरवोद्गार राज्याचे महसूलमंत्री मा.ना.चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आमदार शिवाजी पाटील यांच्याविषयी सभागृहात काढले.
——————————————–

या ऐतिहासिक निर्णयामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील हजारो शेतकरी कुटुंबांचे स्वप्न अखेर साकार झाले असून, हा दिवस परिसराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button